Tuesday, 31 January 2017

अवकाशकन्या कल्पना चावला - Beyond The Stars..






''On one of the night passes, I dimmed the lights in the flight deck and saw the stars. When you look at the stars and the galaxy, you feel that you are not just from any particular piece of land, but from the solar system”  - Kalpana Chawla




कल्पना चावला (१ जुलै १९६१- १ फेब्रुवारी २००३). अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर. त्यांनी अंतराळात दोन मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमांत त्या ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात राहिल्या होत्या. कल्पना चावला यांचा जन्म हरयाणा राज्यातील कर्नाळ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. बनारसीलाल चावला तर आईचे नाव संज्योती होय. त्या चार भावाबहिणीत सर्वात लहान होत्या. कल्पना यांचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन यांच्याशी झाला होता. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण टागोर स्कूलमध्ये झाले (१९७६). त्यांनी पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगढ येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पदवी (१९८२) आणि टेक्सस विद्यापीठातून अवकाशवैमानिकी अभियांत्रिकी (एरोस्पेस एंजिनिअरींग) या विषयात पदव्युत्तर पदवी (१९८४) प्राप्त केली. त्यांनी १९८८ मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून अवकाशवैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी नासाच्या (NASA) एम्स संशोधन केंद्रात शक्ति-निर्धारित संगणकीय द्रायू गतिकी (पॉवर लिफ्टेड कॉम्प्युटेशनल फ्ल्युइड डायनॅमिक्स) या विभागात कामाला सुरुवात केली. १९९३ साली त्यांची ओव्हरसेट मेथड्स इनकॉर्पोरेशन, लॉस अल्टोस (कॅलिफोर्निया) येथे उपाध्यक्ष आणि संशोधन वैज्ञानिक म्हणून निवड झाली. चावला यांनी काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदांतील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले. डिसेंबर १९९४ मध्ये कल्पना यांची निवड नासा या अंतराळवीर म्हणून, अंतराळवीरांच्या १५ व्या गटात करण्यात आली. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या  एव्हा (EVA, एक्स्ट्रा व्हेईक्युलर क्टिव्हिटी), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाल्या. त्यांच्या कामात रोबॉटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळयानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली त्यांची निवड STS-८७ अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली.

चावला यांनी आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते या विषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एव्हाची (अवकाशात चालण्याची) कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले.

कल्पना चावला यांचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १फेब्रुवारी २००३, या १६ दिवसांच्या कालावधीचे होते. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली. मात्र या मोहिमेचा अंत दु:खद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असतांना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होत्या.

कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या यांच्या परवानगीने कराडमध्ये 'कल्पना चावला विज्ञान केंद्र' १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडिगढ ओल्ड बॉइज् असोसिएशनने 'कल्पना चावला एक्सलन्स' देण्यास सुरुवात केली आहे.

Saturday, 28 January 2017

सूर'सुमन'.. !!

कचकड्याच्या 'मायावी' दुनियेत विश्वास,कृतज्ञता,प्रामाणिकपणा,आदर या आदर्श मूल्यांना फारसा अर्थ नसतो आणि वाव तर अजिबात नसतो.स्पर्धेच्या रानटी इर्षेने इथला हरेक जीव प्रतिस्पर्ध्याला पराभूत करूनच आपला मार्ग प्रशस्त करीत राहतो.जिंकणे आणि आपले स्थान सलामत ठेवणे हाच मर्यादित मंत्र नसानसात भिनलेल्या या रूपेरी दुनियेत जंगलचा कायदा निरंकुश पणे लागू आहे.

पण अशाही स्वार्थी ,नकारात्मक दुनियेत काही जीव असे असतात ज्यांना या कला नगरीत राहून या साऱ्या षडरिपुंपासून दूर राहून आपली कला कारकीर्द बहरवता येते.त्यांच्या या वाटचालीत त्यांना पावलोपावली अडचणी येतात,समोरचा यशाचा मार्ग अचानकपणे धूसर होत जातो, कर्तृत्व वारंवार सिद्ध करण्याची 'शिक्षा' मिळत जाते, हाताशी आलेलं यश/संधी पा-यासारखी निसटून जाते,बरं हे करणारी काही नियती नसते ती असतात तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणस.कां ? कां ? याचे उत्तर शोधण्यात फारसा अर्थ उरत नाही. स्वीकारायच आणि वाट चालत राहायचं मग यशाचा मार्ग दिसतोच.. अश्या प्रख्यात गायिका म्हणजेच सुमन कल्याणपूर.

ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो.शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले.गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे"

गायिका कल्याणपूर यांनी गेल्या तीन दशकांच्या सुरेल प्रवासात १३ भारतीय भाषांमध्ये ३५०० हजाराहून अ​धिक गाणी गायिली आहेत. हिंदी पार्श्वगायन क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करून दाखविले आहे. मराठी सिनेगीत, भावगीत, अभंग, दर्यागीते, हिंदी, गुजराती, भोजपुरी, राजस्थानी, अवधी, मगधी, छत्तीसगढसह विविध भाषांतील सिनेगीते मधूर गायनाने सजवली आहेत. 'नंदाघरी नंदनवन फुलले, सावळ्या विठ्ठला, झिमझिम झरती श्रावणधारा, घाल घाल पिंगा वाऱ्या, केशवा-माधवा, पाखरा जा दूर देशी आणि निंबोणीच्या झाडामागे' ही गीते लोकप्रिय ठरली आहेत. 'न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया,ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा,तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी,परबतो के पेडो पर शाम का बसेरा है,अज हु ना आये बालमा,तुमने पुकारा और हम चले आये,मेरे मेहबुब न जा,नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे,आपसे हमको बिछडे हुए,चले जा चले जा..जहां प्यार मिले,मन गाए वो तराना,दिल ने फिर याद किया' या आणि असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती.

आपल्या जीवनात सर्वोच्च स्थानावर असतानाही त्यांनी प्रत्यक्ष जीवनात मात्र एकप्रकारचा साधेपणाच जपला..त्यांनी ना कधी आपल्या यशाचा गर्व केला, ना कधी मागे राहिल्याबद्दल कुठेही नाराजी व्यक्त केली.

संगीताला समर्पित जीवन जगणा-या 'गान'साम्राज्ञीस जन्मदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा !!






Monday, 23 January 2017

नेताजी - एक असामान्य व्यक्तिमत्व..

"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."
- नेताजी सुभाषचंद्र बोस

त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'
पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला. काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.

स्वा.सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजींचे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्‍यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्‍या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.

नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की "तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल".

जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली. जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.
नेताजी म्हणाले की ''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'. मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".

त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते. आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्‍या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत 'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्‍या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्‍याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्‍या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.

त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है|हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी | इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकर|कोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है| सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!

- चिन्मय कुलकर्णी.










Thursday, 19 January 2017

माणसे जन्माला येतात पण 'माणुसकी‘ निर्माण करावी लागते..

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.


खांडेकरलिखित पुस्तके

    अजून येतो वासफुलांन, अमृतवेल, अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर : व्यकी आणि विचार, उल्का (१९३४), उःशाप, कल्पलता, कांचनमृग ( १९३१ ), कालची स्वप्ने, कालिका, क्रौंचवध ( १९४२ ),  घरटे,  घरट्याबाहेर, चंदेरी स्वप्ने, चांदण्यात, जळलेला मोहर ( १९४७ ), जीवनशिल्पी, झिमझिम, तिसरा प्रहर, तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३, ते दिवस, ती माणसे, दंवबिंदू, दोन ध्रुव ( १९३४ ), दोन मने ( १९३८ ), धुके, नवा प्रातःकाल, पहिली लाट, पहिले पान, पहिले प्रेम (१९४०), पाकळ्या, पांढरे ढग (१९४९), पारिजात भाग १, २, पाषाणपूजा, पूजन, फुले आणि काटे, फुले आणि दगड, मंजिर्‍या, मंझधार, मंदाकिनी, मध्यरात्र, मृगजळातील कळ्या, ययाति, रंग आणि गंध, रिकामा देव्हारा (१९३९), रेखा आणि रंग, वामन मल्हार जोशी: व्यक्ति-विचार, वायुलहरी, वासंतिका, विद्युत्‌ प्रकाश, वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८ ), समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे), समाधीवरील फुले, सहा भाषणे, सांजवात, साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे), सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी स्वप्ने भंगलेली, स्त्री आणि पुरुष, हिरवळ, हिरवा चाफा ( १९३८ ), हृदयाची हाक ( १९३०), क्षितिजस्पर्श.

 
पुरस्कार आणि सन्मान

    वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
    साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)
    पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
    ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी
    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली.



१) जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही !प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो; पण तो दुसर्‍याला लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी!

२) मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य,असे हे जीवन !  लहानपणाच्या आठवणी किती नाजूक मोहक, पण किती बहूरंगी असतात !जणू काही मोरपिसच !

३) शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूनांच साधते!

४) आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा ?

५) प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं ते प्रेम कुणावरही असो ते कशावरही जडलेल असो मात्र ते खंरखुर प्रेम असायला हवं !ते हृदयाच्या गाभ्यातुन उमलयाला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नव्हे. निरहंकारी प्रेम विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करु शकतो ! प्रिय व्यक्तीला तिच्या दोषासहं स्वीकार करण्याची शक्ती खर्‍या प्रेमाच्या अंगी असते - असली पाहिजे !

६) भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं,ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्‍या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!

७) समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.

८)  माणूस

माणूस हा झाडासारखा आहे.

तो सुखासुखी वठत नाही

तो ओलावा शोधत राहतो

त्याचं खर प्रेम असतं - जीवनावर

मग ते जीवन कितीही विद्रूप,

कितीही भयंकर असो !

कारण मृत्युनंतरच्या अंधारात

कुठलीही चांदणी चमकत नाही

हे तो मनोमन जाणतो...

९) रोजनिशी - या डाय-या नाहीत..आपल्या आयुष्यात जि फुले फुलली त्यांचे अत्तर साठवुन ठेवलेल्या कुप्या आहेत या..

१०) लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते!  आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच...

११) कळ्या फ़ुलल्याच नाहित तर जग सुगंधाला मुकेल.

१२) मित्राच्या मॄत्युपेक्षाही मैत्रिचे मरण असह्य असते

१३) माणसे जन्माला येतात...पण माणुसकी निर्माण करावी लागते.

१४) या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन येतं!  स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे - हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.

१५) आपण सदैव आत्मकेंद्रित असतो.नेहमी केवळ स्वत:च्याच सुख-दु:खाचा विचार करतो.त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं !तू दु:खाच्या पिंज-यात स्वत:ला बंदिवान करुन घेऊ नकोस. त्या पिंज-याचं दार उघडं,पंख पसर आणि आकाशात भरारी मार.जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार..

१६) जीवन नेहमीच अपूर्ण असतं. ते असं असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे...

१७) जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं!

१८) त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , ते रणांगण आहे.






                                    विष्णू सखाराम खांडेकर  यांस जन्मदिनी विनम्र अभिवादन !

Friday, 13 January 2017

संक्रांत ते व्हॅलेन्टाईन.. एक 'उत्तरा'यण !!

          गेल्या दोन महिन्यांपासून बॅंका नि एटीएमसमोर लागलेल्या रांगा आता काहीशा आक्रसल्या आहेत.एटीएममधून दोन-अडीच हजारांऐवजी चार-साडेचार हजार रुपये मिळू लागल्यानं गर्दी ब-यापैकी घटलीय.आठ नोव्हेंबरच्या रात्रीनंतर आपल्याच जुन्या नोटांना दूर सारण्याचं अन्‌ त्यांच्या बदल्यात नव्या नोटांना आपलसं करण्यासाठी जो तो झटत होता.थंडीतल्या दुपारीही घामानं निथळलेल्या अवस्थेत प्रत्येक जण स्वतःच्या मताचे अन्‌ देशाच्या हिताचे 'अर्थ' नि 'कारण' शोधत राहिला.कालच्या नोटा नकोशा झाल्या होत्या, नव्या हाताशी येतही नव्हत्या.ही जीवघेणी घालमेल ज्याच्या वाट्याला आली नाही, असा 'नोटवाला' सांप्रत देशी सापडणार नाही. नव्या नोटेच्या गुलाबी स्वप्नाची ही वाट तशी काटेरी, तरी प्रत्येकासाठी अटळ होती. बॅंका, एटीएमच्या रांगांतून हाती लागलेली एखादी गुलाबी नोट शर्टाच्या खिशात अलगद ठेवून पुढं निघालेल्या तमाम मराठी जनांच्या दृष्टीला एका नव्या सिनेमाचं पोस्टर पडलं नि गुलाबी खिशाखालच्या हृदयाचे कप्पे उगाच धडधडू लागले. जणू काहीतरी प्रचंड वेगानं बाहेर येऊ पाहत होतं अन्‌ काहीतरी त्याला तेवढ्याच जोमानं रोखत होतं. समोरचं पोस्टर विचारंत होतं, "ती' सध्या काय करते..? अन्‌ इकडे दिलाचं प्रत्येक कंपन त्याचं उत्तर मागत होतं.जुन्या नोटांचं दुःस्वप्न मोठ्या निकरानं पिटाळून लावत नव्या, गुलाबी नोटांच्या स्वप्नपूर्तीत रमलेल्या जीवांचा आता दुस-याच गुलाबी स्वप्नानं पाठलाग सुरू केला होता..

          सुखाच्या झोपेचं स्वप्न पाहावं, इतकी जर ती दुर्मिळ झाली असेल, तर झोपेत पडणा-या सुखस्वप्नांचा विचारच न केलेला बरा..! दुनियादारीत पिचलेल्या प्रत्येक जीवाला आधार असतो, तो अशा सुखस्वप्नांचा. आणि अशा स्वप्नांनीच त्याच्या भावविश्‍वाभोवती फेर धरलेला असतो. हा फेर त्याला जगण्याच्या रहाटगाडग्यातून सोडवत असतो नि कळत- नकळत गुंतवतही राहतो. भूतकाळातल्या कटू आठवणींना तो स्वप्नात येऊ देत नाही नि सुखद स्मृतींना काही केल्या जाऊ देत नाही. अर्थात हा अवखळ खेळ त्याचं मन खेळंत असतं. बहिणाबाईंनी त्याला "वढाळ वढाळ' संबोधत, कितीही हाकललं तरी फिरुन फिरुन उभ्या पिकात शिरणा-या गुराची उपमा दिली. पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टीकडं ओढ घेण्याची त्याची खोड काही जात नाही. या चंचल मनानं दिसाउजेडी वा गाढ झोपेत पाहिलेली स्वप्नं ही कित्येकांच्या भावविश्‍वाला समृद्ध करीत असतात. आयुष्यात "सेटल' झालेल्या, होऊ लागलेल्या नि चाळशी ते पन्नास-पंचावन्नच्या मधल्या वयात रेंगाळणाऱ्यांना तर अशा सुखस्वप्नांची जणू आसच लागलेली असते. कामाच्या ठिकाणी वाढलेला ताणतणाव, सार्वजनिक वातावरणातली कमालीची दांभिकता नि बेबनाव अन्‌ घरात अपेक्षा, मागण्या-गा-हाण्यांचा जमाव.या अटळ वाटेवर कधीतरी अवचित एक पोस्टर समोर उभं राहतं नि गूढ हसत विचारतं... "ती' सध्या काय करते? ते पाहणा-यापैकी कित्येकांच्या हृदयाची उगाच क्षणभर धडधड होते... अन्‌ आयुष्याच्या सिनेमाचा फ्लॅशबॅक सुरू होतो...

         गेल्या दहा-पंधरा दिवसांत मराठीजनांच्या भावविश्‍वाला "ती' सध्या काय करते? या एकाच प्रश्‍नानं कवेत घेतलंय. सोशल मीडियात हा प्रश्‍न हॅशटॅग करुन वा अगदी सहज विचारुन त्यावर आपापल्या पद्धतीनं उत्तरं देणा-यांच्या नि शोधणा-यांच्या प्रतिभेला खरं तर सलामच केला पाहिजे. सिनेमाच्या दिग्दर्शन वा अभिनयातून कदाचित जे व्यक्त झालं नसेल, ते ते सारं केवळ कल्पनाविलासाने सांगण्या-या, मांडणा-या, चितारणा-या पोस्ट पाच-सहा इंचांच्या स्क्रीनवरुन बोटाबोटाने पुढं सरकताहेत. त्यातही शाळेत जायला नको म्हणणा-या आपल्या गुबगुबीत "पेढ्या'ला घेऊन स्कूल बसची वाट पाहत थांबलेली "ती'..बसमधून कुण्या "बर्फी'ने या पेढ्याला हाक मारताच तो डोळे पुसत तिकडे धावतो अन्‌ आपल्या या सुपुत्राकडे "ती' माऊली अचंबितपणे पाहत राहते..ही सात-आठ ओळींची गोष्टही दोन पिढ्यातल्या बदलत्या भावविश्‍वाचं नेमकं वर्णन करणारी... कुठून सुचतं हे सगळं सोशल मीडियात वावरणा-यांना, हेही नवं कोडं! अनेक जण "ती' सध्या काय करते, यापेक्षा "ही' सध्या काय करते, हे जास्त महत्वाचं असल्याचं काहीशा उपरोधिक, पण सावध शैलीत सांगत आहेत. आपला मोबाईल "अंडर व्हिजिलन्स' असण्याच्या धास्तीतून आलेली असुरक्षितताही त्याला कारणीभूत असावी! त्यातच "ही'च्या आग्रहामुळं हा सिनेमा बघायला जायची एखाद्यावर वेळ आली अन्‌ तो संपेपर्यंत "ही' पडद्यापेक्षा सारखं त्याच्याकडंच बघत असेल, तर आपण "त्या' गावचेच नाही, अशा स्थितप्रज्ञपणे बसून राहण्यासाठी जे उच्चप्रतीचं कौशल्य लागतं, ते साधनेशिवाय लाभणं केवळ अशक्‍य! ज्यांच्या नॉस्टॅल्जियात अशी कुणी "ती' रुंजी घालत असेल अन्‌ तरीही जे निर्विकार असतील, त्यांनी एक तर अशी साधना साधली असेल अथवा ते "ही'च्याशी सर्वार्थाने एकरुप झाले असतील.या दोन्ही गोष्टी तशा असामान्यत्वाची झलक दाखवणा-या...

         "ती' असते कुठं, करते काय, असे प्रश्‍न पडणा-या आजच्या प्रौढ पिढीच्या हाती "त्या' काळी ना मोबाईल होते, ना व्हाटस्‌ ऍप, फेसबुक..अनेकांना या गोष्टी तेव्हा नव्हत्या,याची खंतही असेल. "त्या' गरजेच्या वेळी असलं "माध्यम' असतं, तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं, असंही अनेकांना उगाच वाटू शकतं. अर्थात ही "माध्यमे' तेव्हा नव्हती, यात धन्यता मानणा-यांचीही कमी नसेल अन्‌ त्यात अनेकांच्या "ती'चाही समावेश असू शकतो! पण, शालेय अथवा महाविद्यालयीन जीवन पंचवीस-तीस वर्ष मागे सोडलेली पिढी नव्या माध्यमांतही चांगलीच रमली आहे, हे जास्त महत्वाचं. कुठून कुठून मोबाईल नंबर मिळवून अनेक जुन्या मित्रांचे, शाळा- महाविद्यालयांचे, विशिष्ट वर्षाच्या बॅचचे व्हाटस्‌ ऍप ग्रूप तयार झाले आहेत. अनेकांच्या फेसबुक वॉलवरही जुन्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमलेला असतो. तिथं शुभेच्छा, गप्पा अन्‌ माहितीची देवाणघेवाणही सुरू असते. त्यातूनच मग शाळा-महाविद्यालयांमध्ये जुन्या वर्गांचे गेट टुगेदर होतात. त्या निमित्ताने काहींना सध्या "ती' काय करते, हेही ब-यापैकी कळतं. तरीही व्हाटस्‌ ऍप, फेसबुक अथवा अशा गेट टुगेदरमधून होणा-या भेटीगाठींमध्ये अशा सगळ्यांनाच "ती' भेटते असंही नाही. संसाराच्या दुनियादारीशी इमानदारी राखंत अशांचं मन "ती'च्या ठावठिकाणाचा वा नुसतंच कुठंतरी सुखात असण्याचा ठाव घेत राहतं...

       "ती'चा शोध ज्याला घ्यायचा त्यानं जरुर घ्यावा, पण त्यातून आपल्या नव्या पिढीच्या हाती निरपेक्ष नि कसदार संबंधांचा ठेवा देण्याची कलाही साधता आली पाहिजे. ज्यांची मुलं-मुली आता "त्या' वयात आली असतील, येत असतील अशांनी त्यांच्याशी वागता-बोलताना आपल्या तरुणपणातल्या मानसिक अवस्थेची आठवण ठेवली, तरी आई-बाप नि मुला-मुलींमध्ये मैत्रीचा नवा बंध निर्माण होईल. कारण "ती' सध्या काय करते? याच्या उत्तराचा शोध कदाचित क्षणात लागेलही अथवा तो आयुष्यभर सुरूही ठेवता येईल...प्रश्‍न आहे तो,या स्वप्नरंजनाच्या पलीकडं जावून खऱ्या आयुष्यात कुठं थांबायचं हे ओळखण्याचा. भूतकाळातल्या सुखस्मृतीत काही काळ रमलंही पाहिजे, अनेकदा त्यातून नवं काहीतरी हाती लागतं. फक्त तिथं रेंगाळायचं किती, हेही महत्वाचं."तिचा' वा "त्याचा' शोध घ्यायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला कुणाची काही हरकत असण्याचं कारण नाही, पण त्यातून पुढं तयार होणाऱ्या नव्या नात्याला भावनिक नि वैचारिक परिपक्वतेची फळं लगडली, तर त्या शोधाला काही अर्थ आहे...

  -विजय बुवा


   




        सकस विचारांच्या मातीत मनाची मशागत झाली की अशी फळं आपोआप हाती येतात. 'दिल-ए-नादॉं तुझे हुऑ क्‍या है...' असं विचारणाऱ्या गालिबपासून मन मोकाट मोकाट त्याच्या ठाई ठाई वाटा...असं मानणा-या बहिणाबाईंपर्यंत अनेकांनी मनाला मेंदूवर स्वार होऊ देऊ नका, हेच तर सांगितलंय.या मनावर स्नेहाचा, गोडीचा संस्कार करणा-या संक्रांतीपासून अदृश्‍य ओढीच्या व्हॅलेन्टाईनपर्यंत.."ती' सध्या काय करते? यांसारख्या आयुष्यात पडणा-या सा-या प्रश्‍नांचे "उत्तरा'यण अशा विवेक-विचारांच्या प्रगल्भतेनेच पूर्ण होऊ शकते.आपल्याला गवसलेल्या शुभ्र वास्तवाच्या हातात हात घालून फुलांची वाट चालायची की आपल्यापासून दुरावलेल्या नि आभासी बनलेल्या गुलाबी स्वप्नाचा काटेरी पाठलाग सुरू ठेवायचा..? काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस...