Tuesday, 3 May 2016

एक होती गोष्ट...

















"माझ्यासोबत तुम्ही पोलिस स्टेशनला याल का?
मला एक तक्रार द्यायची आहे
लहानपणी ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी
माझ्या शाळेतून, माझ्या घरातून हरवल्या आहेत
कोणतं पोलिस स्टेशन ही तक्रार ही नोंदवून घेईल...?"
ही तक्रार विक्षिप्त वाटेल; पण खरंच सांगतो, आजच्या आत्मकेंद्री समाजव्यवस्थेचं विश्लेषण करतानासमाजातल्या गोष्टी संपल्या’, हेही एक कारण आपल्याला नोंदवावं लागेल! लाहन मुलं का बदलली? ती इतकी कोरडीठाक का झाली आहेत? त्यांच्यातलं भाबडेपण कुठं हरवलंय? त्यांच्या डोळ्यात आज स्वप्नाळूपण का दिसत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतानागोष्टी संपल्या आहेत,’ हे एक महत्त्वाचं कारण सांगावं लागेल.

शाळेवर लिहिताना मे महिन्याच्या या स्तंभात हेतुतः हा विषय मी निवडला आहे. हा सुटीचा महिना आहे. म्हणजेच कुटुंबात शिक्षण होण्याचा हा महिना आहे. या महिन्यात घरातले आई-वडील आजी-आजोबी हेच मुलांचंशिक्षकअसतात आणि अंगण हाशाळेचा वर्गआहे; पण हे सारं आज कुठून आणायचं? आजी-आजोबा एकतर नाहीत आणि असले तरी ते गोष्टी सांगत नाहीत.

आपल्या बालपणी आपल्याला गोष्टी कोणत्या वाटांनी ठाऊक झाल्या, हे कोणत्याही पन्नाशीच्या माणसाला विचारा... पहिली वाट म्हणजे त्या पिढीतल्या लहानग्यांना आजी-आजोबा गोष्टी सांगत असत. दुसरी वाट म्हणजे, शाळेत शिक्षक गोष्टी सांगत असत. तिसरी वाट म्हणजे, ‘चांदोबासारखी मासिकं लहानपणी घरात हमखास असायची. पोथ्यांचं आणि कहाण्यांच्या पुस्तकाचं मोठ्यानं होणारं वाचन हेही एक मोठं संचित होतं. मी लहानपणी चतुर्मासात पोथी ऐकायचो. आज असं वाटतं, माझी वाढलेली शब्दसंपदा, विकसित झालेली कल्पनाशक्ती, भावुकता या सगळ्यांमध्ये या ऐकलेल्या पोथ्यांचं योगदान नक्कीच आहे. त्यातला भाबडेपणा वय वाढल्यावर साहजिकच गळून पडला; पण त्या माणसांची सुख-दुःखं अजूनही मनात रुतून बसली आहेत. रामायण-महाभारत, त्यातल्या कथा आपल्या भावविश्वाचा किती खोलवर रुजून बसलेल्या आहेत! चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूला बाहेर येण्याचा रस्ता सापडल्यानं कासावीस होणारे आपण... श्रावणबाळाला बाण लागल्यावर त्याच्या मागं आई-वडिलांचं काय होईल, या चिंतेनं पिळवटून निघणारे आपण... राम वनवासाला निघालेला असतानाथांब सुमंता, थांबवि रे रथहे गीतरामायणातलं गीत ऐकताना डोळ्यांच्या कडा पाणावणारे आपण... कृष्णाच्या बाललीलांमध्ये स्वतःला शोधणारे आपण... आपल्या मुलांच्या आयुष्यात हे सारं आता कुठून आणायचं? पाच-दहा हजार वर्षांपूर्वी घडलेल्या किंवा घडलेल्या या कथांमधले नायक आपल्या आयुष्याचे भाग बनून गेले आहेत. बोरं खाणारी शबरी, पट्टी बांधणारी गांधारी, बोबड्या बोलाचा पेंद्या, सुदामा हे सारे आयुष्यभर आपल्या भावविश्वात वस्तीला आलेत... पण आपल्या मुलांच्या कोरड्याठाक भावविश्वात हे सारं सारं कसं संक्रमित करायचं?

दोन अनुभव सांगतो. पाचवीच्या मुलांना इंग्लिश नावं तयार करता यावीत म्हणून गृहपाठ दिला. ‘रामायण-महाभारतातल्या पात्रांची नावं इंग्लिशमध्ये लिहून आणा,’ असं सांगितलं. रामायण-महाभारतातली नावं ही काहीशी कठीण असल्यानं मराठी जोडाक्षरांच्या सरावासाठी इंग्लिशमध्ये अभ्यास द्यायला ती उपयुक्त आहेत. मात्र, घडलं असं की, अनेकांनी ही नावं लिहून आणली नाहीत. ‘कंटाळाहे कारण असावं, असं मला वाटलं; पण खोलात गेल्यावर कळलं, की त्या गोष्टीच मुलांना माहीत नाहीत साहजिकच ती पात्रंही ठाऊक नाहीत. त्यामुळं अनेकांनी हा गृहपाठ केलेला नव्हता.  

दुसरा अनुभव असा :-  एकदा धड्यात चर्चचा संदर्भ आला. आमच्या गावात मोठं चर्च नाही, तेव्हा मुलांना काहीच समजेना. मगयेशू ख्रिस्त माहीत आहे का?’ असं विचारल्यावरनाव माहीत आहे; पण त्यांच्याविषयी काही माहिती नाही,’ असं उत्तर आलं. हे धक्कादायक वाटेल; पण आपल्या पुढच्या पिढ्या केवळ पुढं सरकत आहेत. ज्या येशूच्या नुसत्या नावानं जगातल्या सर्वधर्मीयांना, मानवजातीला शतकानुशतकं प्रेम-करुणा शिकवली, ज्याच्या क्रूस घेऊन टेकडीवर चढण्याच्या नुसत्या आठवणीनं आपण आजही कासावीस होतो, तो महामानव येशू मुलांना माहीतसुद्धा नसावा?

तेव्हा मे महिन्यातघरातल्या शाळे तुम्हाला-मला शिक्षक होऊन गोष्टींचा, हा आपल्या परंपरेचा ठेवा आपल्या मुलांसमोर ठेवावा लागेल. इंग्लिश शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तर हा प्रश् अधिक गंभीर होत आहे. तेव्हा त्या पालकांना यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतील. रामायण-महाभारत-पंचतंत्र या गोष्टी केवळ गोष्टी नाहीत, तर त्यातून भारतीय जीवनमूल्यं प्रतिबिंबित झालेली आहेत, तेव्हा मुलांच्या जीवनमूल्यांसाठी तरी हे करावं लागेल अन्यथा निंजा, डोरीमोम यांसारखे कार्टूनमधले महापुरुषच (!) त्यांच्या आयुष्याचे हीरो होतील.

आज मुलं मोबाईल, टीव्हीला चिकटून बसलेली आहेत. सरासरी टीव्ही बघण्याचा कालावधी मी तपासला, तर सुटीत तो किमान पाच तास भरतो. तक्रार करण्यापेक्षा गोष्टींचा पर्याय आपण त्यांच्यासमोर ठेवणार आहोत का? मी स्वतः घरातला टीव्ही दोन वर्षं झाली, बंद करून टाकला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच झाला आहे; पण सगळ्यांनाच हे शक् नसेल तर टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर गेम यांचा किमान कालावधी ठरवून देणं शक् आहे की नाही ? फक्त दीड तास टीव्ही बघण्याचं वेळापत्रक आई-वडिलांनाही लागू केलं गेलं पाहिजे. अन्यथा एकतर्फी बदल होत नसतो. जेव्हा आपल्या हातात घरात पुस्तकं दिसतील तेव्हाच ती चाळली जातील. तेव्हा प्रथम पालकांनी पुस्तकं वाचायला हवीत.

माझ्यासह जवळपास सगळ्याच पालकांनी एक कबुली द्यायला हरकत नाही, की आपल्याला गोष्टी माहीत नाहीत. रामायण-महाभारत, शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या गोष्टी वगळता मला किती गोष्टी माहीत आहेत...?  २५ गोष्टीसुद्धा आठवत नाहीत. त्यात पुन्हा उपदेश करणाऱ्या गोष्टी वगळून हसवणाऱ्या विनोदी कथा, साहसकथा, भयकथा अशा गोष्टी किती आठवतात? अशा स्थितीत आपली मुलं जर कॉम्प्युटर आणि मोबाईलला चिकटली तर दोष कुणाला द्यायचा?


 




तेव्हा बालसाहित्यातली पुस्तकं सर्वात प्रथम आणायला हवीत. जगभरच्या बालसाहित्याचं मराठीत अनुवादित संचित खूप मोठं आहे. रेणू गावस्कर यांनी या जगातल्या गोष्टी आपल्या भावविश्वावर कसा परिणाम करतात, यावरगोष्टी जन्मांतरीच्या’ (शब्द प्रकाशन) नावाचं खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे.
मात्र, केवळ पुस्तकांची खरेदी करून मुलं वाचणार नाहीत. सुरवातीला पालकांनी गोष्टी वाचून त्यांना गोष्ट सांगणं, नंतर एखादी गोष्ट त्यांच्यासोबत वाचणं असं केलं तरच मुलं वाचायला लागतील. वर्षाचे दिवस असतात ३६५. घरात लहान मूल असेल, तर पालकांना ३६५ गोष्टी माहीत असायला हव्यात. रोज नवी गोष्ट ! मुलांना खाऊ देणाऱ्यापेक्षा गोष्टी सांगणारा जास्त आवडतो! ‘हरितात्याहे पु. . देशपांडे यांनी लिहिलेलं एक व्यक्तिचित्र आहे. त्यात हरितात्यांच्या गोष्टी सांगण्याच्या शैलीविषयी सांगून त्यांनी पुढं लिहिलंय हरितात्यांनी आम्हाला कधी खाऊ आणला नाही; पण आमच्या मनगटात इतिहासाचा अभिमान भरलाते हरितात्या आपल्या आयुष्यात का आले नाहीत, याची हुरहूर लागून राहते; पण हरकत नाही, आपण आपल्या मुलांचेहरितात्याहोऊ या!
यात शाळांना करण्यासारखं खूप आहे. आज शिक्षकांनाही फारशा गोष्टी माहीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं शाळेतच काय; पण बालवाडीतसुद्धा गोष्टी सांगितल्या जात नाहीत. शाळेची सुरवात गाण्यानं झाली पाहिजे आणि शाळेचा दिवस हा गोष्टीनं संपला पाहिजे. नाहीतरी शेवटच्या अर्ध्या तासात मुलं काहीही शिकण्याच्या अवस्थेत नसतात. अशा वेळी शाळा सुटताना रोज गोष्टी सांगाव्यात. शाळा २२० दिवस भरते, तर किमान २०० गोष्टी एकत्र करून त्या टाईप करून प्रत्येक वर्गात एक संच असायला हवा. शिक्षकांनी जर ठरवलं, तर नक्कीच या सुटीत ते २०० गोष्टी जमवू शकतात. ‘आपल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐका आणि त्या गोष्टी लिहून आणा,’ असा एक छान प्रकल्प होऊ शकतो. आदिवासी भागात तर वृद्ध व्यक्तींना खूप गोष्टी माहीत असतात.

साने गुरुजी कथामालाहा एक खूप छान उपक्रम आहे. तो शाळाशाळांत पुन्हा सुरू व्हायला हवा. त्यातून गोष्टी पुन्हा पोचू शकतील... ज्येष्ठ नागरिक संघानं अनाथाश्रमात, अपंगशाळांमध्ये जाऊन गोष्टी सांगण्याचा उपक्रम करायला हवा.
माझे मित्र शांताराम गजे यांनी एकदाश्यामची आईहा चित्रपट मुलांना दाखवला, तर अनेक मुलं निम्म्यातूनच उठून गेली. आज मुलं इतकी कोरडीठाक होत आहेत. ‘डिस्कव्हरीवर वाघ हरणावर झेप घालण्याच्या क्षणी आपण चॅनेल बदलतो. कारण ते बघवत नाही. मुलं मात्र ते मन लावून बघतात... अशी मुलं उद्या खून, अत्याचार, शोषणसुद्धा अशाच थंडपणे बघणार नाहीत कशावरून...? ते व्हायचे नसेल तर फक्त गोष्टीच मुलांना कोमल, तरल, संवेदनशील बनवू शकतील. तेव्हा चला, आजपासूनच मुलांना गोष्टी सांगू या...!

-------------------------------------------------------------------
केवळ पुस्तकांची खरेदी करून मुलं पुस्तकं वाचणार नाहीत. सुरवातीला पालकांनी गोष्टी वाचून त्यांना गोष्ट सांगणं, नंतर एखादी गोष्ट त्यांच्यासोबत वाचणं असं केलं तरच मुलं वाचायला लागतील. वर्षाचे दिवस असतात ३६५. घरात लहान मूल असेल, तर पालकांना ३६५ गोष्टी माहीत असायला हव्यात. रोज नवी गोष्ट ! मुलांना खाऊ देणाऱ्यापेक्षा गोष्टी सांगणारा जास्त आवडतो!
-------------------------------------------------------------------

- हेरंब कुलकर्णी

 

No comments:

Post a Comment