Tuesday, 3 May 2016

हरि वाजिव गीता मुरली..




 भारता तार या कालिं  कालिं I हरि वाजिव गीता मुरली  II धृ II

नाचून कालियामौलिं  I हरि वाजिव गीता मुरली II
     परतेचा हल्ला आला I फितुरीचा मारा झाला I
     ऎक्याचा किल्ला पडला I धनराशी चोरी गेला
परतंत्र मायभू झाली  I हरि वाजिव गीता मुरली II II II 


कापट्यखड्ग उपसून I ये गुलामगिरी धांवून I
       करी स्वातंत्र्याचा खून I मोदास नेई पळवून I
ऎक्याची करुनी होळी  I  हरि वाजिव गीता मुरली II II  


 कलहाचें नाचे भूत I समतेचा झाला अंत I
      पडलेंच ज्ञान बंदींत I  हे सत्य करी आकांत
न्यायश्री अश्रू ढाळी I हरि वाजिव गीता मुरली II II 


विघ्नाचा वणवा आला I सुगुणांचा मळा जळाला I
       पापांचा सुकाळ झाला I भ्रांतिचा बाजार आला I
हृदयाची लज्जा गेलि I हरि वाजिव गीता मुरली II II 


लोकांस कळेना धर्म I मानिती अधर्मी धर्म I
      तत्वांचें सरलें प्रेम I प्रेमाचें नुरलें नाम  I
नरकानें जनता न्हालि I हरि वाजिव गीता मुरली II II 


हरि वाजिव गीता मुरली I धांव धांव रे वनमाली I
      तुजवीण नाहिं कुणि वाली I आम्हांस तार या कालीं I
तुझी आशा केवळ उरलि I हरि वाजिव गीता मुरली II II 


हरि वाजिव गीता मुरली I कर सुजना विक्रमशाली I
             धैर्याची झडूं दे भेरी I नाचूं दे धर्मबल समरीं I
होउं दे सत्य जयशालि I हरि वाजिव गीता मुरली II II 


तव मूरलि मधुर घननीळ I शत्रुत्व भंगुनी सकळ I
      पाषाणा तसे दयाळ I जीवास करील स्नेहाळ I
मरणास हांसविल गालिं I हरि वाजिव गीता मुरली II II 


तव मुरली मोहनगीत I निर्जीवा करी जिवंत I
       षंढास  समरपंडीत I रणधीर रिपुसि भयभीत I
अबलासि करिल बलशालि I हरि वाजिव गीता मुरली II II 


हरी  हांसिव गीताप्रेम I मग त्वदात्म्यासि अभिराम I
        जीवांचें घडूं दे क्षेम I भूतांचा तूं विश्राम I
नांदू दे मोद चिरकालिं I हरि वाजिव गीता मुरली II १० II  


--------------------------------




गोविंद त्र्यंबक दरेकर यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.

नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.

'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.
शरीराने पंगू पण मनाने देशभक्तीने, स्वातंत्र्य प्रीतीने भारावलेले या कवीचे २८ फेब्रुवारी १९२६ ला निधन झाले. पण त्यापूर्वी पंधराच दिवस आधी त्यांनीसुंदर मी होणारही अतिशय गाजलेली कविता रचलेली होती. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा सर्व सर्व झडणार हो तनुचे, नव्या शक्तीचे पंख मला फुटणार हो, सुंदर मी होणार, उडत उडत मग, रडत रडत मग, प्रभूपाशी जाणार, स्वतंत्र तिजला (मातृभूमीला) करा म्हणोनि तच्चरणी पडणार हो ।।’’ अगदी शेवटच्या क्षणीही हे देशप्रेम व्यक्त करणार्या कवीला त्रिवार वंदन !








No comments:

Post a Comment